उसात लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारांमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला.

उसात लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारांमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला. 
सातारा 24 तास न्यूज 
अकबर भालदार. 
पुसेगाव, ता. ८ : पुसेगावसह परिसरातील बहुतांश शेतशिवरात उसाच्या उभ्या पिकात वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारा मधोमध लोंबकळत असल्याने धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना अनेकदा कळवूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी संतापले आहेत.
 सध्या उसाचे पीक तोडणीस आल्याने उसाची पाने वाळू लागली आहेत. बहुतांश शेतात मधोमध लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारा उसाच्या उभ्या पिकाला टेकल्या आहेत. त्यामुळे वादळ-वाऱ्यात तारांच्या घर्षणाने वाळलेल्या पाचटीला आग लागून उसाचे फड जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे हातातोंडाला आलेले उसाचे पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. 
वीज वितरण कंपनीची येथील वीज वितरण व्यवस्था अनेक वर्षांची जुनाट आहे. वारे, पाऊस यामुळे शेतातील अनेक ठिकाणचे खांब कललेले आहेत. शिवाय जीर्ण झालेले विद्युत खांबही तुटून पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वीज वाहक तारांचे आयुष्य संपले तरी त्या बदलल्या जात नाहीत. काही शेतांत वीजवाहक तारा हाताच्या उंचीपर्यंत येऊन लोंबकळत असल्याच्या निदर्शनास येत आहेत. अशावेळी विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यास ठिणग्या उडणे शक्य असून एखादी दुर्दैवी घटना घडू शकते.
शेत-शिवारात लोंबकळत असलेल्या वीज वाहक तारांची वारंवार माहिती देवून दुरुस्तीची मागणी होत असली तरी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. भविष्यातील धोका लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने शेत शिवारातील लोंबकळत असलेल्या तारांची उंची वाढवून घेणे गरजेचे गरजेचे आहे.
चौकट :
शेतात लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारांमुळे उसाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटना अनेकदा ऐकावयास मिळतात. अशा दुर्दैवी घटना आपल्या कार्यक्षेत्रात घडू नयेत म्हणून वीज वितरण कंपनीने या तारा व्यवस्थित करण्याची तातडीने गरज आहे.

फोटो : पुसेगाव : उसाच्या उभ्या पिकात वीजवाहक तारा मधोमध लोंबकळत असल्याने धोका निर्माण झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.